Posts

Showing posts from 2021

अश्वत्थ

 गाभाऱ्यात नंदादीप.…दीपमाळ प्रांगणात  तेज-प्रकाश सोहळा...भेद फकत बहिरंगात। आत उजळे त्रिपुर....नाश त्रिविध तापाचा। मांगल्याचे ते वलय....वेढा सुटे संशयाचा। द्वैताद्वैताचा कल्लोळ....विरे कापरासारखा। जीव-शिवाला भेटता..राहे प्राण का पारखा?  आता शाश्वत अश्वत्थ....दीप्ती सहस्ररश्मीची।  शुभ्र तेजाने झरते...आभा दृढ स्थिरतेची।। आरती जोशी-ऋचा प्रभुणे    

स्मरणी

स्मरणी म्हणे  नाम घेतले,जे मणी स्पर्शोन पुढे गेले । विसर्जो म्हणू अधिक झाले"मी"पण, नाम न स्पर्शिल्याने।। आरंभ-अंताचे  व्यवधान,आवर्तनांचीही ठेविता जाण ।  तरी,मग कैसे  हरवेल भान, व्यवहारे सर्व व्यापता असे ।। ज्याचे स्वरूप न ये मापता,ऐसा चिदानंद शोधो जाता । संचयाची कास नको आता,  अमेय तीच अनुभूती जाण ।। स्मरणीइतुके मूक  नाही,नाही स्मरणीसम  बोलके काही । आत्मसुखाची हीच ग्वाही,अंतःकरण "नाम" जपो आता।। आरती जोशी-ऋचा प्रभुणे